महापौरांच्या बिघडलेल्या वाहनावर पावणेचार लाखांचा खर्च

मुंबईची संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना मुसळधार पावसाचा फटका बसला अाहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बसला असून साचलेल्या पाण्यात त्यांची गाडी अडकल्यानं तब्बल साडेचार लाखांचं नुकसान महापालिकेला सहन करावं लागलं अाहे. गेल्या वर्षी २९ ऑगस्टला तुंबलेल्या पाण्यामुळे महापौरांची गाडी अडकून त्यात बिघाड झाला होता. त्यामुळे तब्बल पावणेचार लाख रूपये खर्च करून गाडी दुरुस्त करण्यात आली आहे.

असा झाला बिघाड

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या ताफ्यात महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही गाडी आहे. २९ ऑगस्ट २०१७ रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगर पाण्याखाली होते. त्यामुळे या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौरांचं वाहन पाण्यात अडकलं आणि त्यात बिघाड झाला.

११ महिन्यांनी दुरुस्ती

महापौरांच्या कारमध्ये बिघाड झाल्यानंतर ती कार तशीच पडून होती. अखेर त्याच्या दुरुस्तीसाठी ६ जुलै २०१८ चा मुहूर्त मिळाला. तब्बल ११ महिन्यानंतर महिंद्राचं अधिकृत सर्व्हिस सेंटर असलेल्या जीथ्री मोटारकडे हे वाहन दुरुस्तीसाठी पाठवण्यात अालं. मात्र दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरनं महापालिकेला ३ लाख ७१ हजार ९०२ रुपयांचं बिल पाठवलं आहे.

भूमिकेवर संशय

मुळात महिंद्रा एक्सयूव्ही ५०० या गाडीची किंमत १२ ते १३ लाख रुपये असून या वाहनाच्या दुरुस्तीसाठी ११ महिन्यांच्या विलंबानंतर पावणेचार लाख रुपये खर्च केल्यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. त्याचबरोबर महापालिकेचं स्वतःचं गॅरेज असतानाही वाहनाची दुरुस्ती बाहेर केल्यामुळे संशयाला अधिकच खतपाणी घातलं जात अाहे. त्यानंतर महापौरांसाठी नवीन वाहन खरेदी करण्यात आलं होतं. परंतु त्याचा हमी कालावधी संपुष्टात येण्याची वाट प्रशासन पाहत होतं, असंही बोललं जातं आहे.


हेही वाचा -

महापालिकेच्या 'डी' वाॅर्ड कार्यालयात मनसे, शिवसेनेचा राडा

जेलीफिश येतात कुठून? वाचा येथे


पुढील बातमी
इतर बातम्या