मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून झाडं उन्मळून अाणि झाडांच्या धोकादायक फांद्या पडण्याच्या घटना घडत आहे. आतापर्यंत झालेल्या दुर्घटनामध्ये ७ जणांचे बळी गेले आहे. उन्मळून पडलेल्या झाडांपैकी बहुतांशी झाडं ही आतून वाळवीने पोखरल्याने कमजोर होऊन पडली होती. मुंबईतील अशी अनेक झाडं वरवर दिसायला सुस्थितीत व मजबूत दिसत असली तरी आतून कर्करोगानं ग्रासावी तशी व्याधीग्रस्त झाली आहेत. त्यामुळे ही झाडं जिवंत असली तरी आतून मृतच पावलेली आहेत.
अातापर्यंत ७ बळी
मुंबईत पावसाळ्यात झाडं उन्मळून पडणे तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या तुटून पडणं असे प्रकार सुरुच आहे. या घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणीचं काम महापालिकेनं हाती घेतलं. यासाठी विभाग स्तरावर कंत्राटदारांची नेमणूकही करण्यात आली आहे. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून दुर्घटना घडू नये यासाठी सुमारे ९५ हजार झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. मात्र, तरीही जून आणि जुलै या दोनच महिन्यांमध्ये सुमारे १४०० झाडे तसेच धोकादायक फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या अाहेत. या दुघर्टनांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी झाले. सर्वांधिक झाडे ही पश्चिम उपनगरांत पडली आहेत.
वाळवीनं पोखरली
दादरमध्ये शारदाश्रम शाळेसमोरील पडलेले भेंडीचं झाडं हे आतून पूर्ण पोखरलं गेलं होतं. तसंच शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या गल्लीत झाड पडून श्रेया राऊत नावाची मुलगी कायमची जायबंदी झाली. तेही झाडं आतून पोखरलं होतं. त्यामुळे बहुतांशी झाडं ही आतून वाळवीनं पोखरली गेली होती. संपूर्ण मुंबईत सुमारे २९ लाख ७५ हजार झाडं असून रस्त्यालगतच १ लाख ८५ हजार झाडं आहेत. या रस्त्यालगतचीच बहुतांशी झाडं ही किड्यांनी आतून पोखरुन या झाडांना मृतप्राय बनवलं आहे. त्यामुळे रस्त्यालगतची बहुतांशी झाडं ही दिसायला मजबूत असली तरी आतूनच खंगून गेल्यामुळे ती केव्हा माना टाकून लोकांचं जीव घेऊन जातील याचा नेम राहिलेला नाही.
झाडं शोधण्याचं तंत्र नाही
यासंदर्भात उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी म्हणाले की, मृत तसंच धोकादायक झाडं तसेच झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केलेली आहे. जी मृत अथवा धोकादायक झाडं असतात ती कापली जातात. परंतु बहुतांशी झाडं ही वरून दिसायला मजबूत असतात, परंतु आतून पोखरली गेलेली असतात, अशी धोकादायक झाडं शोधण्याचं कोणतंही तंत्र आमच्याकडे नाही. त्यामुळे जेवढी झाडं आम्हाला दिसली जातात, तेवढी धोकादायक झाडं आम्ही कापण्याचा प्रयत्न करत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खिळे, तारांमुळे झाडं कमकुवत
रस्ते, रस्त्यांलगतचे नाले तसेच युटीलिटीजकरता केलं जाणार खोदकाम यामुळे झाडांना कमकुवत बनवण्याचं काम केलं जातं. त्यातच बऱ्याचदा झाडांना ठोकले जाणारे खिळे किंवा गुंडाळलेली तार यामुळे जे बीळ तयार होतं, त्यातून किटक, जिवाणू आतमध्ये प्रवेश करतात. ते मग आतून झाडं पोखरुन टाकतात, असं वृक्षप्राधिकरणाचे माजी सदस्य व वृक्षप्रेमी अभिजित चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
तक्रारीची दखल नाही
मुलुंडमधील एक झाड आतून पोखरलं गेल्यामुळे ते धोकादायक अवस्थेत होतं. हे झाडं पडून दुघर्टना होईल म्हणून आपण दर दिवसी याची माहिती विभाग कार्यालयाला देत होतो. त्यानंतर महिन्यातच हे झाडं पडून एका गाडीचं नुकसान झालं. त्यामुळे महापालिकेला आधी धोकादायक झाडं ओळखता येत नाही आणि आम्ही लक्षात आणून दिली तरी ते त्यावर कार्यवाही करत नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा -
वीरपत्नींना एसटीचा आजीवन मोफत पास