महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकित एकमतानं हा निर्णय घेण्यात आला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, गुढीपाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा, रमजान उत्साहात साजरी करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.
येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारनं संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता.
विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे.
हेही वाचा