Lower parel bridge लोअर परळ पुलाचं काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील गोखले पुलाचा भाग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलं असून, लोअर परळ स्थानकातील पूलाचं पाडकाम करण्यात आलं. या पुलाचं पाडकाम करून अनेक महिने उलटून गेले तरी काही निर्णय आला नव्हता. मात्र, आता या पुलाचं काम रेल्वे आणि महापालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे. या पुलाच्या पूर्वेकडील पाया रचण्याचं काम पूर्ण झाले आहे, तर पश्चिम बाजूकडील पाया भरण्याचं काम हवामानाचा अंदाज घेऊन केलं जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली.

नवीन पूल बांधण्यासाठी पश्चिम रेल्वेनं लॉकडाऊन कालावधीचा उपयोग केला. फिजिकल डिस्टन्सिंग, सर्व नियमांचं पालन करून काम सुरू आहे. २ महिन्यांपूर्वी स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील भागातील पुलाचा पाया रचला. त्याआधी पूल निर्मितीसाठी मायक्रो पाइलिंगचं काम १४ नोव्हेंबर, २०१९ पासून आतापर्यंत सुरू आहे. ते पूर्ण होताच ४० दिवसांमध्ये आतील खोदकाम, पुलाचे काम सुरू होणार आहे.

यासाठी महापालिका आणि रेल्वे एकत्र निधी उपलब्ध करून देणार आहे. या पुलाच्या कामाकरिता आणखी १० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, मार्च, २०२१ पर्यंत तो पूर्ण होईल. पुलाकरिता महापालिकेने रेल्वेला १२५ कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

या पुलाच्या कामासाठी ९३ अभियंता, पर्यवेक्षक, कामगारांच्या एका पथकानं १४ तासांत ६८५ क्युबिक मीटर सिमेंटीकरणाचं काम केलं. पाया घालण्यासाठी ९२ मेट्रिक टन स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला. पश्चिम रेल्वेनं पुलाच्या कामासाठी ८७ कोटींचे कंत्राट दिलं आहे.

या पुलाच्या कामाकरिता आणखी १० महिन्यांचा कालावधी लागणार असून, रेल्वेकडून या पुलाचे काम ३१ मार्च, २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. प्रभादेवी आाणि अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने ४५५ पुलांचे सुरक्षा ऑडिट केलं होतं. त्यामध्ये लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचं निदर्शनास आले. त्यानुसार, जुलै, २०१८ मध्ये पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून पाडण्यात आला. महापालिका आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तरीत्या पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाऊन काळात लोकल आणि एक्स्प्रेस बंद असताना मध्य रेल्वेनं पुलांच्या पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामं पूर्ण केली. मध्य रेल्वेच्या ५ विभागांतील ३३ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची क्षमता वाढविणं, जलवाहिनी वाढविण्यासह पुलांच्या पुनर्बांधणीचं काम या काळात करण्यात आलं. कल्याण व शहाड स्थानकांदरम्यान वालधुनी नदी पुलावरील दोन्ही दिशेकडील मार्गावर जीर्ण झालेल्या स्टील गर्डरच्या जागी नवे स्लॅब टाकले. पनवेल-कर्जत दरम्यानच्या भागत आरसीसी बॉक्स टाकून पुलाचं पुनर्निर्माण ४ दिवसांत पूर्ण करण्यात आलं.


हेही वाचा -

Best Mini Ac Bus कोरोनाच्या भीतीनं प्रवासी टाळताहेत बेस्टच्या मिनी एसी बसचा प्रवास

नालासोपारा एसटी स्टॅंड परिसरात प्रवाशांचा उद्रेक


पुढील बातमी
इतर बातम्या