राज्य सरकारने कोरोना संशयितांची (coronavirus) तपासणी करण्यासाठी चाचणी केंद्रांची संख्या वाढवली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. परंतु चिंता करण्याचं काहीही कारण नाही. मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतत देखील आहेत. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका, संयम हीच कोरोनाला रोखण्याची सर्वात मजबूत तटबंदी असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं.
मजबूत तटबंदी
राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा संयम आणि धीर ठेवण्याचा सल्ला जनतेला दिला. ते म्हणाले, या लढाईमध्ये आपला संयम आणि आपली जिद्द हीच आपली तटबंदी आहे. या तटबंदीवर त्या विषाणूने कितीही टकरा मारल्या तरी आपण लेचेपेचे नाही आहोत. आपल्या आत्मविश्वासाची, संयमाची, जिद्दीची तटबंदी ही मजबूत आहे. याच जोरावर आपण ही लढाई जिंकू.
हेही वाचा- महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील
सध्या ठिकठिकाणी कोरोनाबाधित आणि कोरोना संशयित (corona positive) रुग्ण सापडल्याने संबंधित परिसर सील करण्याच्या बातम्या येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून ही दक्षता घेण्यात येत आहे. जिथे जिथे आपल्याला पॉझिटीव्ह रुग्ण सापडतात, त्यांच्या अलीकडचे आणि पलिकडचे संपर्क आपण शोधतो आणि त्यांच्यापासून इतरांना कोणाला संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत.
चाचणी केंद्र वाढवले
पूर्वीच्या तुलनेत आपण चाचणी केंद्रांची संख्या वाढवली आहे. काही खासगी (test labs) लॅबमध्येही चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आधी ज्यांच्यात लक्षणे नव्हती, पण आता लक्षणं आढळून आलेले संशयित देखील चाचणी करून घेत आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढलेला दिसत आहे. हा आकडा सरकारच्या अपेक्षेनुसार सध्या तरी असला, तरी ताे अपेक्षेबाहेर जाऊ नये म्हणून सरकार दक्ष आहे.
त्यामुळे माझी परदेशातून जे जाऊन आले आहेत. त्या सर्वांना माझी विनंती आहे, की तुम्ही लपून राहू नका, तुमच्यात कुठलीही लक्षणे आढळून आल्यावर त्वरीत कोरोनासंबंधीत केंद्राशी संपर्क साधा. प्रशासनाने क्वारंटाईनचा सल्ला दिलेलाा असतानाही घराबाहेर पडू नका, स्वत: सोबत इतरांचा जीव धोक्यात घालू नका. सर्वसामान्यांनीही आपल्या घरातील एसीचा वापर कमी करा, थंड पाणी पिण्याऐवजी साधं पाणी प्या, गरम पेय प्या एकूणच अॅलर्जीपासून दूर रहा. सर्दी खोकल्यापासून दूर रहा, असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.