मुंबई–अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस या गाडीमध्ये डब्यांची संख्या कायमस्वरूपी वाढवण्यात आली आहे. 28 एप्रिलपासून या गाडीत 16 ऐवजी 20 डबे करण्यात आले आहेत.
प्रवाशांची वाढती गर्दी आणि या गाडीला मिळणारी पसंती लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 22961/22962 मुंबई सेंट्रल–अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चार अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये तीन एसी चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास डबा समाविष्ट आहे.
या वाढीमुळे प्रवाशांना अधिक आसन उपलब्ध होणार असून, देशातील सर्वाधिक व्यस्त इंटरसिटी मार्गांपैकी एक असलेल्या या मार्गावर प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
ही गाडी 491 किलोमीटरचा प्रवास सुमारे 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. मार्गावर मुंबई सेंट्रल, बोरिवली, वापी, सूरत, वडोदरा आणि अहमदाबाद येथे थांबे आहेत.
ट्रेन क्रमांक 22961 अहमदाबादहून सकाळी 6:05 वाजता सुटते आणि मुंबई सेंट्रलला 11:45 वाजता पोहोचते. तर मुंबई सेंट्रलहून ही गाडी दुपारी 3:45 वाजता सुटून रात्री 9:15 वाजता अहमदाबादला पोहोचते.
ही सेवा रविवारी वगळता आठवड्यातील सहा दिवस सुरू असते.
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, 2025–26 या आर्थिक वर्षात सुमारे 4 कोटी प्रवाशांनी वंदे भारत सेवांचा वापर केला असून, यात वर्षभरात सुमारे 34 टक्के वाढ झाली आहे.
2019 मध्ये सुरू झाल्यापासून वंदे भारत एक्सप्रेसने आतापर्यंत 9.1 कोटीहून अधिक प्रवाशांना सेवा दिली असून, 1 लाखहून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. या गाड्यांची सरासरी आसन भराव क्षमता (occupancy) 100 टक्क्यांहून अधिक असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा