ठाण्यात वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहन धुण्यावर (कार वॉश सेंटर) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. या पक्षांच्या नेत्यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात, केवळ कार वॉश सेंटरवर निर्बंध का लादले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.
त्यांनी पाण्याची गळती, चोरी आणि बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर यांसारख्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अपव्ययाकडे लक्ष वेधले. या समस्या अधिक गंभीर असून, लहान व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी मोठ्या स्तरावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, या बंदीमुळे कार वॉश व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि कामगारविरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेने शहरातील घटता पाणीसाठा आणि वाढती टंचाई लक्षात घेऊन ही बंदी लागू केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा
