महापालिकेने या रस्त्याची मंजूर रुंदी 27.5 मीटरवरून 17 मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रस्ता अरुंद केल्यास परिसरातील वाहतूक कोंडी आणखी वाढेल, असा दावा रहिवाशांनी केला आहे.
मलबार हिल परिसरात वाढीव FSI मुळे अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात या भागातील वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असून, त्याचा वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. अशा परिस्थितीत रस्त्याची रुंदी कमी करणे योग्य नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
रस्ता अरुंद झाल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने आणि इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यताही रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या प्रश्नावर रहिवाशांनी यापूर्वी राज्य सरकारमधील विविध अधिकाऱ्यांकडेही तक्रारी आणि निवेदने दिली होती.
या निवेदनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल २०२५ मध्ये महापालिका प्रशासनाला काम थांबवण्याची नोटीस देऊन रस्त्याची मूळ रुंदी कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते.
वाळकेश्वर रोड हा मलबार हिल परिसरातील महत्त्वाचा जोडमार्ग आहे. वाळकेश्वर, रिज रोड, नेपियन सी रोड, डुंगरशी रोड आणि बाणगंगा परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.
याशिवाय राजभवन, हँगिंग गार्डन, कमला नेहरू पार्क आणि बाणगंगा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक आणि ऐतिहासिक ठिकाणी जाण्यासाठीही या मार्गाचा वापर केला जातो.
त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी केल्यास केवळ स्थानिक वाहतूकच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा रहिवाशांचा दावा आहे.
आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात काय निर्णय होतो, याकडे मलबार हिलमधील रहिवासी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा