मुंबईत बुधवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्टजाहीर केला होता. आता हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत रेड अलर्ट कायम ठेवला आहे. पालिकेने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.
मुंबईत गुरुवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार मुंबई शहर, उपनगरांत पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू आहे.
हवामान विभागाने मुंबईत गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर महानगरपालिका आयुक्त, प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील शाळा, तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. त्याचबरोबर मुंबईतील नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा :
मुंबईत गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १४५.१ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. त्याचबरोबर वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खालापूरजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ११ च्या सुमारास पाणी साचले. परिणामी, मुंबईकडून पुण्याकडे जाणारी मार्गिका बंद करण्यात आली.
हेही वाचा