प्लास्टिक बंदी : रविवारी ५९२ किलो प्लास्टिक जप्त

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबईत सुरु झाली आहे. रविवारी दिवसभरात एकूण ८६७ दुकानांसह शॉपिंग सेंटर आणि मॉल्समधील गाळ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७२ दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ५९१.६७ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून ३ लाख ३५ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून अापल्या घरातील प्लास्टिक पिशव्या अाणून जमा केल्या. 

२६९ निरिक्षकांचे पथक

प्लास्टिक बंदीची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर २३ जूनपासून याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शनिवारी २६९ निरिक्षकांच्या पथकांना प्रशिक्षण दिल्यानंतर रविवारी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. रविवारी संध्याकाळपर्यंत महापालिकेच्यावतीने परवाना विभाग, बाजार विभाग आणि दुकाने व आस्थापना विभाग आदी तीन विभागांच्या पथकाने एकूण ८६७ दुकानांसह इतर ठिकाणची तपासणी केली. यामध्ये ७२ ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी दिली आहे. यासर्वांकडून दिवसभरात ३ लाख ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ५९१.६७ किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 दंड भरण्यास नकार 

या कारवाईत दुपारपर्यंत ४८५.५५ किलो ग्रॅम एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला होता. संपूर्ण दिवसभरात केवळ ५ दुकानदार तसेच गाळेधारकांनी दंडाची ५ हजारांची रक्कम भरण्यास नकार दिला असल्याचे चौधरी यांनी सांगितलं. मात्र, याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी, जे दुकानदार, गाळेधारक दंड भरणार नसतील त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं. 

त्यामुळे आपल्याला दंड भरावा लागू नये यासाठी सर्वांनीच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. तसेच आपल्याकडे प्लास्टिक पिशव्या असतील तर महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या प्लास्टिक पिशव्या संकलन केंद्रांमध्ये किंवा पेट्यांमध्ये नेऊन टाकाव्या, असं आवाहन अजोय मेहता यांनी केलं आहे.


हेही वाचा -

सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी

'आम्ही गिरगावकर' कडून कापडी पिशव्यांचे वाटप


 

पुढील बातमी
इतर बातम्या