रेल्वे स्थानके तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विक्री केले जाणारे ‘रेलनीर’चे बाटलीबंद पाणी सोमवारपासून एक रुपयाने स्वस्त होणार आहे. यापुढे एका लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी 14 रुपये, तर 500 मिली बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये मोजावे लागणार आहेत.
संपूर्ण देशभरात हा नवीन दर लागू होणार आहे. इंडियन रेल्वे पॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनमार्फत (आयआरसीटीसी) ‘रेलनीर’ बाटल्यांच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या सर्व स्थानकांसह वापी आणि वलसाड स्थानकांत ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो. काही वेळा ‘रेलनीर’चे उत्पादन घटल्यावर पाण्याच्या बाटल्यांचा अपुरा पुरवठा होतो. त्या काळात रेल्वेने निवडलेल्या इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जाते. त्या बाटल्यांच्या किमतीतही बदल केला गेला असून तेथेही प्रवाशांना एक रुपयाने स्वस्त पाणी बाटली मिळणार आहे.
अलिकडेच जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांमध्ये, कर रचना 5% आणि 18% अशा दोन स्लॅबमध्ये सुलभ करण्यात आली आहे, जी पूर्वी 5%, 12%, 18% आणि 28% होती. ही सुविधा 22 सप्टेंबरपासून लागू होईल.
भारत सरकारने घोषित केलेल्या दर रचनेच्या अंमलबजावणीपूर्वी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर जीएसटी तक्रार निवारण सक्षम केले आहे, असे ग्राहक व्यवहार विभागाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 56व्या परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा