मुंबईतील GST भवनला दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीत जीवाची पर्वा न करता ९ मजले चढून जाऊन राष्ट्रध्वज सुखरूप आणणारे शिपाई कुणाल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुणाल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.
कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काल ट्वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाधव यांना‘सह्याद्री’वर बोलावून घेतलं. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला. याशिवाय शाल, श्रीफळ तसंच शिवाजी महाराजांची प्रतीमा देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आलं.
कुणाल जाधव हे जीएसटी भवनला शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आग लागली तेव्हा ते तळमजल्यावर होते. बचावकार्य सुरू असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचं जाधव यांच्या निदर्शनास आलं. आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी ते जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत-पळत चढून गेले आणि तिरंगा सुखरूप खाली आणला.
कुणाल जाधव हे वांद्रे गव्हरमेंट कॉलनीत राहतात. त्यांच्या घरी आई, मुलगी, भाऊ-वहिनी आणि त्यांचा मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे. कुणाल यांच्या कतृत्वावर कुटुंबियांना देखील त्यांच्यावर अभिमान आहे.
हेही वाचा