मुंबईतील पर्यावरणाच्या बाबतीत कुणाचीही मनमानी आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मेट्रो ३ कारशेडसाठी आरे काॅलनीतील झाडे तोडण्याला कडाडून विरोध केला. शिवसेना भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेचा मेट्रोला अजिबात विरोध नाही. मुंबईकरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मेट्रो अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत असताना, ठिकठिकाणची झाडे तोडली जात असताना आणि मेट्रोच्या कामांमुळे स्थानिकांना त्रास हाेत असतानाही आम्ही संयम बाळगल्याचं आदित्य यांनी स्पष्ट केलं.
पण आरेत उभारण्यात येणाऱ्या कारशेडचा विषय वेगळा आहे. कारशेडच्या विरोधामागे कुठलंही राजकारण नाही. कारण या कारशेडमुळे आरेतील फक्त झाडेच तोडली जाणार नाहीत, तर तेथील जैवविविधताही धोक्यात येणार आहे. मेट्रोच्या कारशेड उभारणीमुळे आरेचं कुठलंही नुकसान होणार नाही, हे मेट्रो प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. जे चुकीचं आहे. आरेतील पर्यावरण मुंबईसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपला फक्त कारशेडला विरोध आहे. असल्याचंही आदित्य म्हणाले.
हेही वाचा- Video: निसर्गाचा बळी देऊन विकास नको! आरेतील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंनी उठवला आवाज
'आरेतील कारशेडला मुंबईकरांचा विरोध असताना मागच्या ४ वर्षांपासून हजारो कोटी रुपये का खर्च करण्यात आले? शेवटच्या क्षणी प्रकल्प दुसरीकडं करता येणार नाही, असं या प्रकल्पाचे अधिकारी सांगतात. तर इतके दिवस ते काय करत होते? असा प्रश्न उपस्थित करताना हा घोटाळा आहे का? याचा तपास झाला पाहिजे, असंही आदित्य म्हणाले. शिवाय आरेतील कारशेडशिवाय प्रकल्प पूर्ण करण्यास जमत नसलेल्या अधिकाऱ्यांना बाजूला करून मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणारे नवे अधिकारी आणायला हवेत, असंही ते म्हणाले.
हेही वाचा-
‘आरे’प्रकरणी भावनिक नको, अभ्यासपूर्ण युक्तिवाद करा, हायकोर्टाची सूचना
‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’, पर्यावरणप्रेमींचं आंदोलन