मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील मेट्रो ३ या प्रकल्पासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे. या कारशेडसाठी तब्बल २७०० झाडं तोडली जाणार आहेत. मात्र, ही झाडं तोडू नये यासाठी विविध स्तरावरून विरोध केला जात आहे. अशातच रविवारी ‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’ अशा घोषणा देत पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध केला. आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात आरे संवर्धन समितीच्यावतीनं मेट्रो कारशेडला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.
मुंबईला स्वच्छ आणि शुद्ध हवा देण्यासाठी आता आरे कॉलनीतील जंगलच शिल्लक राहिले आहे. त्यामुळं येथील झाडं नष्ट केली, तर मुंबईचा शुद्ध हवेचा स्रोतच नाहीसा होईल, अशी भीती व्यक्त करीत पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केलं. या आंदोलनात समता युवा मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
आरेमधील जंगल हे आदिवासींचं जीवन आहे. सरकारनं कारशेड दुसरीकडे हलवावी, अन्यथा आदिवासी चिपको आंदोलन करतील, असा इशारा आदिवासी हक्क संवर्धन समितीच्यावतीनं देण्यात आला आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमी आणि आरेतील आदिवासींचे प्रश्न जाणून घेतले. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिलं.
हेही वाचा -
मुंबईसह उपनगरात गुरुवारपर्यंत संततधार, हवामान विभागाचा अंदाज