भारत विरूद्ध न्यूझीलंड वनडे सीरीजच्या दुसऱ्या मॅचच्या अवघ्या काही तास आधी पीच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं एक धक्कादायक स्टिंग समोर आलं आणि अवघ्या क्रिकेट विश्वाला धक्का बसला. याआधी अनेक वेळा मॅच फिक्सिंगची प्रकरणं समोर आली आहेत. 2013 साली आयपीएलमध्ये श्रीसंतने केलेलं स्पॉट फिक्सिंग अजूनही भारतीय क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत. त्यानंतर, गेल्या 4 वर्षांत फिक्सिंगचं कोणतंही प्रकरण समोर आलं नव्हतं. मात्र पांडुरंग साळगावकर यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटवर फिक्सिंगचा बट्टा लागण्याची शक्यता आहे.
1994 - फिक्सिंगचं पहिलं प्रकरण
श्रीलंकेविरूद्ध 1994 साली झालेल्या मॅचमध्ये हवामान आणि पीचबद्दलची गोपनीय माहिती एका भारतीय बुकीला दिल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्क वॉ आणि शेन वॉर्न यांच्यावर सिद्ध झाला. त्याबद्दल त्यांना सामन्याची मोठी रक्कम दंड म्हणून भरावी लागली.
फिक्सिंगचं हे पहिलंच प्रकरण असल्यामुळे याचा क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला होता.
1997 - भारताचा कॅप्टनच फिक्सर?
1997मध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू मनोज प्रभाकर यांनी दुसऱ्या एका खेळाडूने आपल्याला श्रीलंकेत होणारी पाकिस्तान विरूद्धची मॅच हरण्यासाठी ऑफर केल्याचा दावा केला. या प्रकरणी बीसीसीआय आणि सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन भारतीय टीमचा कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीन दोषी असल्याचं आढळून आलं. त्याने यासाठी बुकी मुकेश गुप्ताकडून मोठी रक्कम स्विकारल्याचंही सिद्ध झालं. यातून 5 डिसेंबर, 2000 रोजी अझरुद्दीन आणि अजय शर्मा यांच्यावर आजन्म बंदी घालण्यात आली. मात्र, 2016मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये अझरूद्दीन निर्दोष असल्याचं समोर आलं.
2000 - ...आणि क्रिकेट विश्वाला धक्का बसला!
2000 सालच्या एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी हॅन्सी क्रोनिए संघाचं नेतृत्व करत होता. यावेळी टीममधील इतर तीन खेळाडू हर्शेल गिब्ज, निकी बोजे आणि पीटर स्ट्रायडम या तिघांना खराब खेळ करण्यासाठी त्यानं प्रवृत्त केल्याचे आरोप त्याच्यावर झाले. शिवाय, त्यासाठी बुकीकडून मोठी रक्कम त्याने घेतल्याचंही बोललं गेलं. भारतीय बुकी मुकेश गुप्तासोबत मोहम्मद अझरूद्दीनने आपली ओळख करुन दिल्याचा दावाही हेन्री क्रोनिएनं केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने नंतर बसवलेल्या किंग्ज समितीने केलेल्या चौकशीत हे आरोप खरे असल्याचं सिद्ध झालं आणि क्रोनिएवर आजन्म बंदी घालण्यात आली.
2011 - अशी सुरु झाली स्पॉट फिक्सिंग
इंग्लंडविरूद्ध लॉर्ड्सवर 2010मध्ये झालेल्या मॅचमध्ये केलेल्या नो बॉल हेराफेरीसाठी पाकिस्तानी क्रिकेटर सलमान बट, मोहम्मद आमेर आणि मोहम्मद आसिफ यांच्यावर कारवाई करण्यात आली. क्रिकेट विश्वामध्ये पहिल्यांदाच स्पॉट फिक्सिंगचा प्रकार लोकांसमोर आला होता. या मॅचमध्ये वारंवार नो बॉल टाकण्यासाठी या तिघांनी मोठी रक्कम स्विकारल्याचं एका स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं होतं. त्यावरुन सलमान बटवर 10 वर्षांसाठी, मोहम्मद आसिफवर 7 वर्षांसाठी तर मोहम्मद आमेरवर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली.
2013 - हाय प्रोफाईल आयपीएल फिक्सिंग
आयपीएलमध्ये 2013 साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्धच्या मॅचमध्ये भारताचा फास्ट बॉलर एस श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्याविरोधात स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. त्यानंतर लगेचच राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटने त्यांच्यासोबत असलेले सर्व करार संपुष्टात आणले. पुढे झालेल्या चौकशीमध्ये हे तिघेही दोषी आढळले. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली. याच प्रकरणी पुढे झालेल्या चौकशीअंती राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांवरही बंदी घालण्यात आली. तसेच, सुनील भाटिया या बुकीसह बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा मुलगा गुरूनाथ मय्यपन यालाही अटक करण्यात आली होती.
हेही वाचा