मुंबईत गेल्या ५ वर्षांमध्ये मुली आणि महिला हरवण्याच्या तसंच अपहरणाच्या प्रमाणात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं दिसत आहे.
मुंबईत गेल्या ५ वर्षात १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील मुलींच्या अपहरणाचं आणि हरवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेल्या ५ वर्षांत १८ वर्षांखालील एकूण ५०५६ तर १८ वर्षांवरील एकूण २१,६५२ मुलींच्या अपहणाच्या आणि हरवण्याच्या घटना घडल्या आहेत.
या मुलींचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावलं जात होतं. याप्रकरणी २०१३ ते २०१७ या कालावधीत आरोपी विरोधात ३ गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तसंच, मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याप्रकरणी ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईत २०१३ साली १८ वर्षांखाली अपहरण झालेल्या मुलींची संख्या ९२ होती. हीच संख्या २०१४ साली १५०० वर पोहोचली. तर २०१७ साली ही संख्या १३६८ वर पोहोचली. मात्र, अपहरण झालेल्या ५०५६ मुलींपैकी ४७५८ मुली सापडल्या असून ३७० मुली अजूनही बेपत्ता आहेत.
वर्ष | १८ वर्षांखालील मुली | १८ वर्षांवरील महिला | ||
---|---|---|---|---|
हरवले | सापडले | हरवले | सापडले | |
२०१३ | ९२ | ७९ | ४०४१ | ३८२३ |
२०१४ | १५०० | १४७५ | ४१७० | ३९४३ |
२०१५ | ९२७ | ८७८ | ४३१५ | ४०३९ |
२०१६ | ११६९ | १०९१ | ४५२७ | ४०९६ |
२०१७ | १३६८ | १२३५ | ४५९९ | ३७८५ |
एकूण | ५०५६ | ४७५८ | २१६५२ | १९६८६ |
हेही वाचा-
मुंबईला टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांची नवी खेळी!
बलात्कार प्रकरणात मिमोह चक्रवर्तीला होणार अटक?