लोकमान्य टिळक टर्मिनलवर नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. संजय पटेल आणि अरविंद प्रसाद अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी आतापर्यंत १२ हून अधिक जणांना लुटल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मूळचे बिहारचे असलेले दोघेही आरोपी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांशी रिझर्वेशन करतेवेळी जवळीक साधायचे. त्यांना चहा पाजण्याच्या बहाण्याने घेऊन जायचे आणि त्यांना चहासोबत बिस्कीट खायला घालायचे. या बिस्किटात गुंगीचे औषध असल्याने बिस्कीटं खाल्ल्यानंतर प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना लुटायचे. ८ मार्च रोजी निलेश सोमवंशी आणि सचिन गायसमुद्रे या आरपीएफ जवानांना एलटीटीवर गस्त घालत असताना संजय पटेल आणि अरविंद प्रसाद यांची संशयास्पद हालचाल दिसली.
हे दोघे जण तिकीट रिझर्वेशन सेंटरजवळ प्रवाशांसोबत संशयास्पद वावर करताना आढळून आले. तेव्हापासून पोलिस त्यांच्यावर नजर ठेवून होते. एका प्रवाशाला हे दोघेही नेहमीप्रमाणे बिस्किट खाण्यासाठी नेत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्या प्रवाशाला हे बिस्किट चारणार त्याच वेळी पोलिसांनी त्याला बिस्किट खाण्यापासून थांबवून दोघांची अंगझडती घेतली. अंगझडतीमध्ये त्यांना या दोघांकडे क्रीम बिस्कीटांचे ३ पुडे सापडले. तपासादरम्यान या बिस्कीटांमध्ये त्यांनी गुंगीचे औषध मिसळले असल्याची माहिती उघड झाली. अधिक चौकशीत दोघांनी पनवेल येथील एका फॅक्टरीमध्ये काम करत असल्याचं सांगितलं. तसंच मागील अनेक दिवसांपासून अशाप्रकारे १२ जणांना लुटल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -
आता पोलिस ठाण्यातही भरणार जनता दरबार
अमेरिकेतून मिळाली वांद्रे स्टेशन उडवण्याची धमकी!