मागील ६ वर्षात मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये तब्बल ३१०० टक्क्यांची वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ६ वर्षांमध्ये लोकलमधून ५९ हजार ९०४ मोबाइल चोरीला गेले आहेत. चोरीस गेलेल्या या मोबाइलची किंमत तब्बल ९९ कोटी ४६ लाख ९६ हजार रुपये आहे. मोबाइल चोरीच्या वाढत्या घटनांस आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या रेल्वे पोलिस आणि जीआरपीएफचा सुरक्षेचा दावा मात्र फोल ठरला आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत लोकलमधून चोरीला गेलेल्या मोबाइल चोरीची आकडेवारी माहिती अधिकारात रेल्वे पोलिसांकडे मागितली होती. शेख यांना दिलेल्या उत्तरात रेल्वे पोलिसांनी मोबाइल चोरीची ही आकडेवारी दिली आहे. पाच वर्षांमध्ये चोरी झालेल्या मोबाइलपैकी केवळ ८ हजार ८६८ मोबाइल परत मिळाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
२०१३ साली १ हजार ४५ मोबाइल चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी केवळ ७१० मोबाईल परत मिळाले होते. तर २०१४ मध्ये २ हजार ५१८, २०१५ मध्ये २ हजार ०९२, २०१६ मध्ये २ हजार ९, २०१७ मध्ये २० हजार ७६४ आणि २०१८ मध्ये ३२ हजार ४७६ मोबाइल चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षी आतापर्यंत २ हजार ५१७ मोबाइल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा -
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे; तर राज्याच्या महासंचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल
मुलांची हत्या करून आईची आत्महत्या, परळमधील घटना