देशभरातल्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचा गुन्हेगार असलेल्या सतीश पांडेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सीबीएसईचे १०वी आणि १२वीचे पेपर लीक केल्याबद्दल झारखंड पोलिसांनी झारखंडचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता सतीश पांडेला अटक केली आहे. सतीश पांडेसोबतच पोलिसांनी बिहार आणि झारखंडच्या विविध भागांमधून ११ जणांना अटक केली आहे.
पाटण्यामधून सीबीएसई बोर्डाचा १०वी गणिताचा आणि १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर लीक झाला होता. पाटण्यामधून लीक झालेले हे पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झारखंडमधील छतर या ठिकाणी पोहोचले अशी माहिती छतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अखिलेश वरियर यांनी दिली आहे.
झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छतरमध्ये एबीव्हीपी नेता सतीश पांडे एक कोचिंग सेंटर चालवत असून त्यातल्या ९ अल्पवयीन मुलांचाही अटक करण्यात आलेल्या मुलांमध्ये समावेश आहे. त्यांना हजारीबागमधील रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. सतीश पांडे हा एबीव्हीपीचा छतर जिल्ह्याचा समन्वयक आहे.
पेपर लीक करण्यासाठी सतीश पांडेने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सुरूवातीला तब्बल ३५ हजार रूपयांपर्यंत किंमत घेऊन हे पेपर देण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
२६ मार्च रोजी १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर होता, तर १०वीचा गणिताचा पेपर २८ तारखेला होता. पेपरच्या काही तास आधीच व्हॉट्सअॅपवर हे पेपर लीक झाले. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली.
या सर्व पार्श्वभूमीवर १२वीचा अर्थशास्त्राचा पेपर देशभरात पुन्हा घेण्यात येईल अशी घोषणा सीबीएसईकडून करण्यात आली आहे. येत्या २५ एप्रिल रोजी ही परीक्षा घेण्यात येईल. तर १०वीच्या फेरपरीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून येत्या १५ दिवसांमध्ये हा निर्णय घेतला जाईल असंही सीबीएसईकडून सांगण्या आलं आहे. दरम्यान, १०वीची फेरपरीक्षा झाली, तरी ती दिल्ली एनसीआर आणि हरियाणा याच भागांमध्ये होणार आहे. त्यामुळे देशातल्या इतर भागातील १०वीच्या विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा
CBSE पेपरफुटी: १० वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, १२ वीची पुन्हा परीक्षा