मुंबईतून २१ कोटींचं युरेनियम जप्त, एटीएसची कारवाई

महाराष्ट्रात दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) मुंबईतून तब्बल सात किलो युरोनियमचा साठा जप्त केला आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २१ कोटी रुपये आहे. या प्रकरणी एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

युरेनियम खरेदी करणाऱ्यासाठी कोणी तयार होत आहे का याचा शोध दोन्ही आरोपी घेत असतानाच एटीएसने त्यांच्यावर छापा टाकला. युरेनियम हा दुर्मिळ धातूंपैकी एक आहे. युरेनियमचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो.

ठाण्यात राहणारा जिगर पांड्या हा युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एटीसच्या नागपाडा युनिटने सापळा रचून जिगरला अटक केली. जिगरकडे चौकशी केली असता त्याला मानखुर्द येथे राहणारा त्याचा मित्र अबु ताहिर याने हे युरेनियमचे तुकडे पुरवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अणु ऊर्जा कायदा १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

एटीएसने या दोघांकडे आढळलेला पदार्थ बीएआरसी येथील प्रयोगशाळेमध्ये चाचणीसाठी पाठवला होता. या चाचणीमध्ये हा पदार्थ नैसर्गिक स्वरुपातील आणि शुद्ध युरेनियम असल्याचं स्पष्ट झालं.

दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडील धातू हा युरेनियमच आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी एका खासगी प्रयोगशाळेची संपर्क साधला होता. एटीएसकडून या प्रयोगशाळेचीही तपासणी केली जाणार आहे.  या प्रयोगशाळेतील व्यक्तींच्या मदतीनेच या दोन्ही आरोपींनी हा घातक पदार्थ आणल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दोघांकडे एवढ्या मोठ्याप्रमाणामध्ये युरेनियम कुठून आणि कसा आला याचा सध्या शोध घेतला जात आहे.


हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल

मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या