लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईच्या पश्चिम उपनगरत ११ मार्च ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत तब्बल १६ हजार लिटर मद्यसाठा जप्त केला आहे. या साठ्याची बाजारात किंमत १८ लाखांपेक्षा अधिक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर या गुन्ह्यात १२८ व्यक्तींना आतापर्यंत अटक केल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन विभागाने विविध भागात धडक कारवाई केली आहे. यानुसार ११ मार्च ते ३१ मार्च २०१९ या कालावधीदरम्यान विविध ९३ प्रकरणी सुमारे ९ लाख ४९ हजार ७७५ रुपये इतक्या किमतीचा ९ हजार ९२४ लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ८४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर रुपये १ लाख ९५ हजार एवढ्या अंदाजित किमतीची ३ वाहने देखील जप्त करण्यात आली.
१ एप्रिल २०१९ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीदरम्यान विविध ४९ प्रकरणी सुमारे ८ लाख ५३ हजार ७६९ रुपये इतक्या किमतीचा ६ हजार १४० लीटर एवढा अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. या अनुषंगाने ४४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर अंदाजे रुपये ६० हजार किमतीची २ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यात ६१७ लीटर हातभट्टीची दारु, १३ हजार २०० लीटर इतक्या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे 'वॉश' रसायन, ५२४.२८ लीटर देशी मद्य, २१८.६३ लीटर विदेशी मद्य, २५१.८७ लिटर बीअर, ताडी १,१९४ लीटर व इतर प्रकारचे ६०.२ लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे. तसेच या अनुषंगाने १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून अंदाजे रुपये २ लाख ५५ हजार किमतीची ५ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा -
नामांकित सलून मालकांना कोट्यावधीचा गंडा; ५ जणांना अटक
मेहुल चोक्सीला दणका, बॅंका करणार कंपनीचा लिलाव