शैक्षणिक वर्ष सुरू झाले की बहुतांश शाळा टॅलेंट हंटच्या नावाखाली खासगी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्र परीक्षा घ्यायला लागतात. या स्पर्धा परीक्षांना बसण्याची विद्यार्थ्यांना सक्ती केली जाते.
परीक्षेचे शुल्क म्हणून पालकांच्या खिशातून पैसे उकळले जातात. अशा अवांतर परीक्षांवर शिक्षण उपसंचालकांनी बंदी आणली आहे. अशा कुठल्याही परीक्षा शाळांमध्ये घेऊ नयेत, असे आदेश त्यांनी जारी केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शाळांमध्ये होणाऱ्या या सक्तीमुळे पालकांच्या खिशाला चाट पडतेच शिवाय विद्यार्थ्यांवरही परीक्षेचे दडपण येते. त्याचबरोबर परीक्षांच्या आयोजनात शिक्षकांचा बराच वेळ वाया जातो.
त्यामुळे अशा अवांतर परीक्षा शाळांमध्ये घेऊ नयेत, अशी मागणी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत चव्हाण यांनी टॅलेंट हंटच्या परीक्षा शाळांनी घेऊ नयेत, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.
'राईट टू एज्युकेशन'मध्ये अशा अवांतर परीक्षा घेण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. याबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आदेश काढावेत, अशी आमची मागणी होती. शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या या आदेशामुळे बेकायदेशीर परीक्षाच्या ताणापासून विद्यार्थ्यांची व अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका झाली आहे.
- अनिल बोरनारे, शिक्षक परिषद
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)