गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पेपरफुटी आणि कॉपीची प्रकरणं समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 'परीक्षा केंद्र आयत्या वेळी बदलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,' अशी ग्वाही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. कॉपी आणि पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याबद्दल शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.
पेपरफुटी आणि कॉपीप्रकरणात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचाच हात असल्याचं उघड झालं आहे. मात्र, याविरोधात शिक्षक आमदार कडक भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यासाठी आणि कॉपीमुक्त महाराष्ट्रासाठी शिक्षक आमदारांनी सहकार्य करावं, असं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी यावेळी केलं.
पेपरफुटी झाल्यावर संपूर्ण राज्यातल्या सगळ्या केंद्रांवर पेपर बदलता येणार नाही, मात्र जिथे पेपर फुटला, तिथेच पेपर बदलण्याचा विचार केला जाईल, असं तावडे यांनी यावेळी सांगितले. यासाठी वेगळा प्रश्नपत्रिकांचा संच छापला जाईल आणि जिथे पेपर फुटेल त्या ठिकाणी या संचातील पेपर पोहोचवला जाईल. याबाबत शिक्षण मंडळाशी चर्चा करू असं तावडेंनी स्पष्ट केलं.
गुणांच्या स्पर्धेमुळे काॅपीचे दलाल तयार होत आहेत. मात्र, याला चाप लावण्यासाठी शिक्षकांचं सहकार्यही महत्वाचं असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा