कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली आहे.
स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासोबतच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तसंच पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येईल असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
'शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत असे सर्वांचेच मत होते. बुधवारीच त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे देण्यात आली होती. शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. या फाईलला त्यांनी मजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल त्या ठिकाणांवर २४ जानेवारी पासून शाळा सुरू केल्या जाणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतला जाईल. सोमवारी २४ जानेवारीपासून शाळा सुरू होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरू होतील' अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा