एटीकेटीच्या भीतीने विद्यार्थ्यांची स्पर्धांकडे पाठ

मुंबई विद्यापीठात सध्या सर्वच अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यातच विविध क्रीडा स्पर्धाही सुरू झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. तसं बघायला गेल्यास हे नेहमीचंच चित्र आहे. पण दरवर्षी विद्यापीठाकडून विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नंतर घेतल्या जातात. मात्र यंदा प्रभारी कारभार पाहणाऱ्या कुठल्याच अधिकाऱ्याकडून नंतर परीक्षा घेण्याचं स्पष्ट आश्वासन विद्यार्थ्यांना न मिळाल्याने एटीकेटी लागू नये, या भीतीने बहुतांश विद्यार्थ्यांनी स्पर्धांकडे पाठ फिरवून परीक्षांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे.

प्र- कुलगुरूंना विनंती

परीक्षांमुळे अनेक खेळाडूंची स्पर्धेची संधी हुकणार असल्याने या खेळाडूंची स्पर्धेनंतर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी बुधवारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी प्रकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना भेटून केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं अश्वासन प्रभारी प्रकुलगुरूंनी दिलं.

स्पर्धेनंतर परीक्षेची खात्रीच नाही

नोव्हेंबरमध्ये अनेक अांतरमहाविद्यालयीन, स्थानिक आणि राष्ट्रीय स्पर्धांचा मोसम सुरू होतो. या क्रीडा स्पर्धांमध्ये चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. असं असूनही यंदा केवळ विद्यापीठाच्या गोंधळामुळे आपल्याला नाहक एटीकेटी लागू नये म्हणून स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण विद्यापीठाकडून त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, याची खात्रीच त्यांना मिळेनाशी झाली आहे.

अनेक विद्यार्थी केटी लागेल या भीतीने स्पर्धेत उतरलेच नाहीत. दरवर्षी मुंबई विद्यापीठातून कबड्डीसाठी १२ जाणांची टीम खेळण्यासाठी उतरते. मात्र विद्यापीठाच्या निष्काळजी कारभारामुळे यंदा केवळ १० जाणांची टीम मैदानात उतरली आहे. खरंतर कायद्यानुसार खेळाडू विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणं विद्यापीठाला बंधनकारक आहे. पण सध्या विद्यापीठात प्रभारी पदांवर कारभार करणाऱ्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्याने पुन्हा परीक्षा घेण्याचं लेखी आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे आम्ही प्रभारी प्रकुलगुरूंची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या ठेवली. 

- प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य

काय आहे कायदा?

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा कलम-५८-२ नुसार आंतरविद्यापीठ स्पर्धा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान परीक्षा असल्यास त्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ निर्णय घेऊ शकते. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना स्पर्धेतही भाग घेता येईल आणि त्यांचं वर्षही वाया जाणार नाही.


हेही वाचा-

द्वीतीय सत्रातील परीक्षांसाठी विद्यापीठाचा मास्टर प्लॅन तयार!

'लाॅ'च्या अॅडमिशनचा पत्ता नाही अन् विद्यापीठ म्हणतंय परीक्षा द्या!

पेपरफुटी प्रकरण: 'त्या' विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पण कारवाई पोलीस अहवालानंतरच


पुढील बातमी
इतर बातम्या