महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचे बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. आता येत्या शुक्रवारी ८ जूनला दहावीचे निकाल जाहीर करण्यात येतील. दहावीचा हा निकाल ऑनलाईन पद्धतीद्वारे दुपारी १ वाजता अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत अनेक तारखा सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र आता याला पूर्णविराम मिळाला आहे. कारण राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल जाहीर करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली असून हा निकाल www.mahresult.nic.in वर जाहीर होईल. दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास १८ लाख विद्यार्थी बसले होते.
बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना तो दुसऱ्या दिवशीपासून करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्यक नमुना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करून गुणपत्रिकेच्या प्रतिसह ९ जून ते १८ जून या कालावधीत तो अर्ज आणि शुल्क भरून विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.
छायाप्रतीसाठी ९ जून ते २८ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करून घ्यायचे असेल, अशा विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट आणि फेब्रुवारी ते मार्च २०१९ अशा दोनच संधी उपलब्ध असतील असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा -
Exclusive Interview: अथक मेहनतीनेच बनलो मुंबईतून टाॅपर- खुशाल राठी