केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. आता दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा घेणार नसल्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. त्यामुळे देशातील सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांवरील फेरपरीक्षेचं संकट अखेर टळले आहे.
सीबीएसईच्या दहावीचा गणिताचा पेपर तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यामुळे या दोन्ही पेपरची फेरपरीक्षा घेतली जाईल, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. मात्र, यावरून टीका होताच सीबीएसईने एक पाऊल मागे घेत सरसकट सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार नाही, असं सांगितलं.
दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा झालीच तर ती फक्त दिल्ली आणि हरयाणा या दोनच राज्यांमध्ये घेतली जाईल, असं अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. जुलैमध्ये ही परीक्षा होईल, अशी शक्यताही वर्तवली जात होती.
अखेर मंगळवारी सीबीएसईने देशात कोणत्याही राज्यात सीबीएसईच्या दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा होणर नाही, असा निर्णय घेतला. मंगळवारी दिवसभरात याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. पेपरफुटीचा गणिताच्या परीक्षेवर फारसा परिणामा झाला नाही, असं चौकशीतून समोर आल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतल्याचं समजतं.
हेही वाचा -
CBSE पेपरफुटी: १० वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, १२ वीची पुन्हा परीक्षा