भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसांत पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ आणि आर्द्र वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या प्री-मान्सून हालचालींचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक भागांवर होणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना आणि गारपीटीची शक्यता आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यापासून या बदललेल्या हवामानामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. काही ठिकाणी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटादरम्यान नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गारपीट आणि जोरदार वाऱ्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे आणि कोकणातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा