पवई सायकल ट्रॅकसाठी एकही झाड तोडलं जाणार नाही : आदित्य ठाकरे

पवई तलाव इथं होणाऱ्या सायकल ट्रॅक प्रकल्पालासाठी एकही झाड न तोडण्याचे आदेश महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) दिले आहेत. सायकल ट्रॅकसाठी झाडं कापली जाणार असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला होता.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ठाकरे म्हणाले की, “वास्तविक पर्यावरण प्रेमी आणि शास्त्रज्ञांनी हा प्रकल्प पाहिला आहे. यासंर्भात प्रशासकिय संस्थेशी सखोल चर्चा केली आहे.” त्यांनी पालिकेला सुरुवातीपासून एकही झाड तोडू नये किंवा कोणताही नैसर्गिक परिसर बदलू नये असं सांगितले होतं.

तलावांमध्ये वाहणारे सांडपाणी आणि तलाव २० टक्के आकुंचित झाल्याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, सर्व सांडपाणी बंद करण्यात येईल. BMC ऑन-इनवेसिव्ह वॉटर एरेटर बसवणार आहे ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारेल.

सरोवराच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी प्रशासनानं राज्य पर्यावरण तज्ज्ञांचे एक पॅनलही स्थापन केलं आहे. मात्र ही समिती केवळ नावापुरती असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांच्या समितीवर आणि त्यांच्या कामाच्या व्याप्तीवर संशय घेणं ही थट्टाच ठरेल, असं ठाकरे म्हणाले.

पवई तलावाच्या शेजारी बांधल्या जाणाऱ्या सायकल ट्रॅकचा मुद्दा चांगलाच तापतोय. पवई तलावासाठी आयआयटीमधील काही विद्यार्थ्यांना आवाज उठवला. आयआयटी पवईच्या संचालकांना, पवईतील स्थानिक आणि सिमेन्स कंपनीचे निवृत्त संचालकीय मंडळ सदस्य श्याम सक्सेना यांनी खुले पत्र लिहिले होते.

पवई तलावाभोवती उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकसाठी काही भागात भराव टाकण्यात येणार असल्याचा आरोप भाजपने केला. याबाबत भाजप खासदार मनोज कोटक यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज प्रशासनाने आपली भूमिका मांडली. पालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने सर्व पैलूंचा विचार करून गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली आहे.


हेही वाचा

बेस्टच्या सर्व बसेस २०२७ पर्यंत इलेक्ट्रिक असतील - आदित्य ठाकरे

गोराई परिसरात खारफुटी संवर्धन केंद्र आणि उद्यान उभारण्यात येणार

पुढील बातमी
इतर बातम्या