नॅशनल पार्कमध्ये ‘वनराणी’ टॉय ट्रेन पुन्हा सुरू

संजय गांधी नॅशनल पार्क (Sanjay Gandhi National Park) येथे वनराणी टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून ती नागरिकांच्या सेवेत दाखल झाली. 

2021 मध्ये सायकलॉन तक्तेमुळे (Cyclone Tauktae) मुळे मोठे नुकसान झाल्याने ही ट्रेन बंद होती. दीर्घ कालावधीनंतर आता आधुनिक स्वरूपात ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेले हे आकर्षण पुन्हा सुरू झाल्याने कुटुंबे आणि मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नव्या स्वरूपातील या ट्रेनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. ट्रेन आता बॅटरीवर चालणारी आणि पर्यावरणपूरक बनवण्यात आली आहे. यामध्ये चार डबे ठेवण्यात आले असून हेरिटेज आणि Vista Dome शैलीतील डिझाइनचा वापर करण्यात आला आहे.

मोठ्या काचांच्या छपरांमुळे आणि रुंद खिडक्यांमुळे जंगलाचे दृश्य पाहता येणार आहे. डब्यांवर उद्यानातील विविध वन्यप्राण्यांच्या चित्रांचे चित्रण करण्यात आले आहे, ज्यामुळे मनोरंजनासोबतच मुलांना शैक्षणिक माहितीही मिळणार आहे. तसेच काही ओपन-एअर कोचही ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवास करताना निसर्गाचा अधिक जवळून अनुभव घेता येईल.

ही ट्रेन सुमारे 5.5 चौ.किमीच्या कृष्णागिरी उपवन परिसरातून धावणार आहे. या मार्गावर जैवविविधता केंद्रे, मिनी प्राणीसंग्रहालय आणि कृत्रिम बोगदे आहेत. एका फेरीत सुमारे 80 प्रवासी बसू शकतात. ही सेवा केवळ मुलांसाठी मनोरंजन म्हणून नसून शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचे उदाहरण म्हणूनही सादर करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.

उद्घाटनावेळी पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी सांगितले की, मुलांना आणि कुटुंबांना पुन्हा आनंद देता यावा म्हणून ट्रेन तात्काळ सुरू करावी. त्यांनी असेही नमूद केले की Vista Dome शैलीची प्रेरणा त्यांच्या रेल्वे मंत्रीपदाच्या काळात सुरू झालेल्या पर्यटन कोचमधून घेतली आहे. त्यांनी उत्तर मुंबई हा देशातील सर्वात सुंदर मतदारसंघांपैकी एक असल्याचेही सांगितले, जिथे निसर्ग आणि शहराचा समतोल दिसून येतो. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून झालेल्या विकासकामांचाही त्यांनी उल्लेख केला.

वनराणी ट्रेनचे पुनरुज्जीवन हे एक स्वतंत्र प्रकल्प नसून व्यापक दृष्टीकोनाचा भाग आहे. त्यानुसार Sanjay Gandhi National Park ला महत्त्वाचे इको-टुरिझम आणि निसर्ग शिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

उद्यानात ई-बगी, ई-बस सेवा, सायकलिंग उपक्रम, थीम गार्डन आणि सफारी सुधारणा यांसारख्या अनेक सुविधा विकसित केल्या जात आहेत. तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कानेरी केव्ज Kanheri Caves या स्थळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठीही पर्यटन सुविधांचा विकास करण्याची योजना आहे.

ट्रेन सेवेसोबत नवीन पायाभूत सुविधा देखील उभारण्यात आल्या आहेत. फुलपाखरू-थीम असलेले स्टेशन तयार केले जात आहे, ज्यामध्ये तिकीट काउंटर, प्रतीक्षा कक्ष, कर्मचारी सुविधा आणि दिव्यांगांसाठी रॅम्प असतील. कृष्णागिरी स्टेशनजवळ लोको शेडही तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे ट्रेनची देखभाल आणि पार्किंग सुलभ होईल.

एकूणच, वनराणी टॉय ट्रेनचे पुनरागमन हे मुंबईतील हरित पर्यटनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


हेही वाचा

पुढील बातमी
इतर बातम्या