नेहाची कविता 'खेळ अजूनही बाकी आहे....'

माणसाला नेहमी दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे पाहण्याची भारी हौस असते. त्यामुळंच बिग बॉसच्या घरात काय चाललंय याचं कुतूहल सर्वांनाच असतं. हे घर सध्या काव्यमय बनलं आहे.

सदस्येची कविता 

बिग बॉसच्या घरात वाद-विवाद, भांडण-तंटा, हाणामारी हे सर्व ठीक आहे. त्यात नॅामिनेशनबद्दल मतभेद, आठवड्याचा टास्क, कॅप्टन्सीची निवडप्रक्रिया या गोष्टीही बिग बॉसच्या चाहत्यांना एव्हाना चांगल्याच अंगवळणी पडल्या आहेत, पण कविता म्हणजे जरा अतीच झालं. त्यामुळं बिग बॉसच्या घरात कोण कसं काय कविता करू शकतं? असा प्रश्न सुजाण प्रेक्षकांना पडणं सहाजिक आहे, पण असं घडलं आहे. काहीशा प्रदूषित वातावरणातही या घरातील एका सदस्येनं कविता केली आहे.

५० दिवस झाले

बघता बघता सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता तब्बल ५० दिवस झाले. या घरानं आतापर्यंत भांडण, अश्रू, वादविवाद, मैत्री, प्रेम सगळच पाहिलं आहे. कधी कधी या घरामध्ये सदस्य खूप खुश असतात, तर कधी कधी त्यांना एकटं वाटतं. हा सर्व माइंडगेम आहे, पण काही झालं तरी जिंकण्याची, खेळण्याची इच्छा मात्र कमी होत नाही. दर आठवड्याला या घरामधून एक सदस्य घराबाहेर पडतो आणि मग काही वेळ हे घर सुन्न होतं. निराश, दु:खी झालेले चेहरे या घरामध्ये वावरताना दिसतात. हे घर प्रत्येक सदस्याला खूप जवळचं आहे. हे घर प्रत्येकालाच काही ना काही देऊन जाणार आहे. 

भाव भावनांचं सुंदर वर्णन

या घरातील सदस्यांच्या ५० दिवसांच्या प्रवासावर नेहा शितोळे हिनं एक अप्रतिम कविता लिहिली आहे आणि तिनं ती सदस्यांना ऐकवूनही दाखविली. माधव, किशोरी, शिवानी, अभिजीत आणि रुपाली त्या क्षणी तिकडे होते आणि त्यांना ही कविता मनापासून नक्कीच आवडली असणार. नेहानं या कवितेमध्ये सदस्यांच्या मनातील भाव भावनांचं खूप सुंदर प्रकारे वर्णन केलं आहे. ज्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या ओळी आहेत 'खेळ अजूनही बाकी आहे, उरले आहे अजून मी पण...'


हेही वाचा -

तीन दिवसांत ५० कोटींची 'सुपर' भरारी


पुढील बातमी
इतर बातम्या