पुराच्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात, डॉक्टरांचा इशारा

मुंबई, मीरा-भाईंदर, वसई रोड, विरार आणि नालासोपारा परिसरात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना पूराच्या पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिस हा सर्वात गंभीर संसर्गजन्य आजार आहे. तरी, दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिस, हिपॅटायटिस A आणि E, त्वचेचे संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग तसेच श्वसनाचे आजार होण्याचाही धोका वाढतो.

पूराच्या पाण्यात सांडपाणी, कचरा, औद्योगिक कचरा आणि विविध प्रकारचे जंतू मिसळलेले असतात. त्यामुळे अशा पाण्याचा अगदी अल्प संपर्कही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तसेच दूषित अन्न-पाणी आणि साचलेल्या पाण्यात वाढणारे डास यामुळेही संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

वॉकहार्ट हॉस्पिटल, मीरा रोडचे क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. अकलेश तांडेकर म्हणाले की, वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पूरस्थितीमुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

संक्रमित उंदीर किंवा इतर प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी जखम, खरचटलेली त्वचा किंवा डोळे, नाक व तोंडाच्या संपर्कात आल्यास हा संसर्ग होऊ शकतो.

ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे साधा व्हायरल ताप समजून अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र, वेळेत उपचार न केल्यास हा आजार मूत्रपिंड निकामी होणे, यकृताचे नुकसान, फुफ्फुसांवर परिणाम आणि जीवघेण्या सेप्सिससारख्या गंभीर गुंतागुंतींना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे लवकर निदान आणि वेळेत अँटिबायोटिक उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नागरिकांसाठी डॉक्टरांचा सल्ला

  • शक्यतो साचलेल्या किंवा पूराच्या पाण्यातून चालणे टाळा.

  • आवश्यक असल्यास वॉटरप्रूफ बूट आणि हातमोजे वापरा.

  • शरीरावरील जखमा वॉटरप्रूफ ड्रेसिंगने झाकून ठेवा.

  • हातांची स्वच्छता नियमित राखा.

  • पूराच्या पाण्याच्या संपर्कानंतर 2 ते 3 आठवड्यांच्या आत ताप किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • स्वच्छ, उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या.

  • ताजे शिजवलेले अन्न खा.

  • घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, जेणेकरून डासांची उत्पत्ती रोखता येईल.

डॉक्टरांनी विशेषतः स्वच्छता कर्मचारी, बचाव पथकातील कर्मचारी आणि पूरग्रस्त भागात साफसफाई करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वेळेत निदान आणि उपचार केल्यास लेप्टोस्पायरोसिससह इतर पावसाळी आजारांपासून गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.


हेही वाचा

झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्यास कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर थेट कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या