देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. देशानं गाठलेला हा टप्पा पाहून जागतिक आरोग्य संघटनेनं देखील कौतुक केलं आहे.
मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितलं की, “या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाली. तेव्हापासून भारतात ७५ कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरु राहिलं तर डिसेंबरपर्यंत देशातील ४३ टक्के लोकांचे लसीकरण पुर्ण होईल. तसंच कोरोना साथीची तिसरी लाट रोखण्यासाठी भारताला वर्षाच्या अखेरीस ६० टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस द्यायचे आहेत.”
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रानं जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशानं ७५ कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.”
जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारताचं अभिनंदन केलं आहे आहे. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी सांगितलं की, “डब्ल्यूएचओनं अभूतपूर्व वेगानं कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचं अभिनंदन केलं. पहिले १०० दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला ८५ दिवस लागले. दरम्यान, भारतानं केवळ १३ दिवसांत ६५० दशलक्ष कोरोना डोसपासून ७५० दशलक्ष करोना डोस देण्याचा टप्पा पुर्ण केला आहे.”
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “ही एक मोठी उपलब्धी आहे. सर्वांना मोफत लस पुरवल्याबद्दल मी जनता, कोरोना योद्धा, राज्य सरकार आणि पंतप्रधान यांचे आभार व्यक्त करतो. लसीकरणाच्या बाबतीत भारतानं अनेक देशांना मागे सोडलं आहे.”
हेही वाचा