उपचार अन् आहार एकत्रच! 'टीबी'च्या रुग्णांना वर्षभराचं रेशन मोफत

उपचार सुरू असतानाच रुग्णाला पोषक आहार देखील मिळावा या उद्देशाने आता मुंबई महापालिकेच्या डॉट्स केंद्रावर 'एमडीआर टीबी' (क्षयरोग) च्या रुग्णांना वर्षभराचं रेशन पुरवलं जाणार आहे. तर, साधारण टीबी असलेल्या रुग्णांनाही त्यांच्या उपचाराच्या काळानुसार रेशन पुरवण्यात येणार अाहे.

दादरमधून झाली सुरूवात

गुरुवारी दादरमधील एका डॉट्स सेंटरपासून रेशन देण्याच्या उपक्रमाला सुरूवात झाली. ८ वर्षीय ओमला पहिल्यांदा रेशन देऊन या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य उपक्रमा (नॅशनल हेल्थ मिशन)च्या निधीतून हा रेशन वाटपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, 'एमडीआर टीबी' रुग्णांना वर्षभर रेशन देण्यात येईल.

मोफत रेशन का?

एखाद्या व्यक्तीला 'टीबी' झाला की पहिल्या दोन महिन्यांत आपोआपच त्या रुग्णाच्या आरोग्याची पातळी खालावते. याच काळात रुग्णांना पौष्टीक आहाराची गरज असते. पोषक आहार न मिळाल्यास उचरांनाही योग्य प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच, डॉट्स सेंटर्सकडून अशा 'टीबी' रुग्णांना रेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'टीबी' हा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे पोषक आहाराची गरज मोठ्या प्रमाणात असते. म्हणून 'टीबी' रुग्णांनी पोषक आहाराचं सेवन करणं आवश्यक आहे. त्यासाठी लवकरच सर्व डॉट्स सेंटर्समध्ये 'टीबी' रुग्णांना पोषक आहार पुरवण्यात येणार आहे. 'टीबी' रुग्णाने सार्वजनिक ठिकाणी खोकताना किंवा शिंकताना काळजी घेतली तर वातावरणात विषाणू पसरणार नाही.

-डॉ. दक्षा शाह, प्रमुख, टीबी नियंत्रण विभाग, महापालिका

किती रेशन मिळणार?

डॉट्स सेंटरकडं नोंदणी असलेल्या 'टीबी' रुग्णांना प्रत्येकी ११ किलो रेशन दिलं जाणार आहे. रेशनमध्ये ७ प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश असणार आहेत. त्यात गूळ, शेंगदाणे, गव्हाचं पीठ, मूगडाळ, मटकी, तांदूळ आणि चन्याच्या पीठाचा समावेश असेल.

प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

या रेशनपासून पौष्टीक अन्नपदार्थ बनवून त्याचं सेवन केलं, तर त्यातून 'टीबी' रुग्णाला १ हजार ४५० एवढ्या कॅलरीज आणि ५५ ग्रॅम प्रथिनं मिळतील. याद्वारे कुठल्याही 'टीबी'च्या रुग्णाला पहिले २ महिने चांगला आहार मिळाल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

'टीबी' झालेल्या रुग्णाने औषधांचा कोर्स पूर्ण केला तरच 'टीबी' पसरण्यापासून रोखता येऊ शकतो. 'टीबी' झालेल्या प्रत्येक रुग्णाने योग्य आहार आणि वेळेवर औषध गोळ्या घेतल्यास तो टीबीमुक्त आयुष्य जगू शकतो.

- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका


हेही वाचा-

औषध विक्रेत्यांनो, टीबीची औषधं विकताय? मग रूग्णांची माहिती ठेवा!

महापालिका घरोघरी जाऊन घेणार टीबीच्या रुग्णांचा शोध


पुढील बातमी
इतर बातम्या