बंद पडलेल्या ऑक्ट्रॉय चेकपोस्टचे रूपांतर ट्रान्सपोर्ट हबमध्ये होणार

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरातील बंद पडलेल्या जकात नाक्यांचे (ऑक्ट्रॉय चेकपोस्ट) एकात्मिक परिवहन केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पाच निष्क्रिय चेकपोस्टचे आधुनिक इंटरसिटी बस टर्मिनसमध्ये पुनर्विकास करण्यात येणार आहे.

या प्रस्तावित परिवहन केंद्रांची उभारणी दहिसर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड, एलबीएस मार्गावरील मुलुंड, मुंबई-नवी मुंबई सीमेवरील ऐरोली आणि मानखुर्द येथे केली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाल्यानंतर 2017 पासून जकात वसुली बंद झाली होती. त्यानंतर या चेकपोस्टची जागा मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय पडून होती.

आढावा बैठकीत या जागांचा सार्वजनिक वाहतूक सुविधांसाठी वापर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सध्या लांब पल्ल्याच्या खासगी बस मुंबईच्या मध्यवर्ती भागात प्रवेश करतात आणि दादर, सायन, चुनाभट्टीसारख्या गर्दीच्या भागातून वाहतूक करतात.

शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या पिक-अप आणि ड्रॉप सुविधांमुळे महामार्ग, मुख्य रस्ते आणि उड्डाणपुलांवर वाहतूक कोंडी वाढत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

नवीन योजनेनुसार, महाराष्ट्र आणि देशातील इतर भागांतून येणाऱ्या इंटरसिटी बसना मुंबईच्या मध्यवर्ती भागात प्रवेश न देता या पाच प्रवेशबिंदूंवरच थांबवले जाईल. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी मेट्रो, खासगी वाहने आणि इतर सार्वजनिक वाहतूक पर्यायांद्वारे शेवटच्या टप्प्याची (लास्ट माईल) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या परिवहन केंद्रांमध्ये तिकीट काउंटर, प्रतीक्षालये, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था यांसारख्या प्रवासी सुविधांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय फूड कोर्ट, शॉपिंग एरिया, रेस्टॉरंट, हॉटेल, बँक्वेट हॉल आणि ऑडिटोरियम यांसारख्या व्यावसायिक आणि मनोरंजन सुविधांचाही समावेश असू शकतो.

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या सादरीकरणादरम्यान या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी प्रकल्पाची माहिती सादर केली. तर BEST महाव्यवस्थापक सोनिया शेट्टी (Sonia Sethi) यांनी BEST डेपो आणि मालमत्तांच्या पुनर्विकासाबाबतची योजना मांडली.

या पुनर्विकासामुळे अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या जकात नाक्यांची जागा सक्रिय परिवहन केंद्रांमध्ये बदलली जाणार आहे. यामुळे मुंबईतील अंतर्गत वाहतूक ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, लांब पल्ल्याच्या बस प्रवाशांना अधिक नियोजित आणि सोयीस्कर सुविधा शहराच्या प्रवेशद्वारांवर उपलब्ध होऊ शकतात.


हेही वाचा

एसटी डेपो परिसरातील अनधिकृत प्रवासी वाहतूक सेवांविरुद्ध कठोर कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या