नैराश्यामुळे अनेक मानसिक आणि शारिरीक समस्यांचा सामना अनेकांना करावा लागतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात विस्कळीतपणा येऊ शकतो. मात्र, इच्छाशक्ती असेल तर तुम्ही प्रत्येक समस्येवर मात करू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. दैनंदिन आयुष्यात तुम्ही या टिप्सचा वापर केलात, तर तुमचे विचार सकारात्मक तर होतीलच, याशिवाय तुम्हाला जगण्याची एक नवी उमेद मिळेल.
१) जेव्हा कधीही एखादा कठिण प्रसंग तुमच्यासमोर येईल, तेव्हा दोन मिनिटं शांत चित्तानं विचार करा. ती गोष्ट केल्यानं आणि न केल्यानं काय परिणाम होतील, याचा विचार करा. परिस्थितीशी दोन हात कसे करता येतील? किंवा या कठिण परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडू शकता असे विचार मनात आणण्याचा प्रयत्न करा.
२) नकारात्मक विचार करण्यात आपली अर्धी शक्ती वाया जाते. नकारात्मक विचार करून तुमच्या मनात भिती निर्माण होते. भितीचं रुपांतर डिप्रेशनमध्ये होतं. यातूनच अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात. याउलट परिस्थिती कशीही असो, पण आपण त्यावर मात केली तर त्याचे किती चांगले परिणाम होतील, याचा विचार तुमच्या मनात आणा. अशाच पद्धतीनं तुम्ही विचार केलात तर तुम्ही मानसिकरित्या खंबीर व्हाल.
३) टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्या. एखादे काम करण्यासाठी तुमची निवड केली असेल. पण ते काम काही कारणांमुळे पूर्ण झाले नाही. तर त्याचे खापर इतरांवर फोडू नका. इतरांच्या चुका पुढे केल्यानं ते लोक पुढच्या वेळी तुमच्या पाठिशी उभे राहणार नाहीत. कठिण प्रसंगी मन एकाग्र राखण्यासाठी इतरांचा पाठिंबा आवश्यक आहे. पाठिंबा नसेल, तर तुम्ही एकटे पडाल आणि त्यातून तुम्ही कुठला तरी टोकाचा निर्णय घ्याल.
४) कठिण प्रसंगांमध्ये आपण सामान्यत: आपले ध्येय विसरून जातो. एकदा का तुम्ही ध्येयापासून भटकलात, तर तुमची एकाग्रता नष्ट होईल. यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येईल. त्यासाठी सर्वप्रथम आपले ध्येय काय आहे? हे मनाला विचारा. उत्तर मिळाले की कठिण प्रसंगाशी लढण्यास मदत होते.
५) एखाद्या वाईट परिस्थितीत सापडल्यास किंवा आजारपणाला कंटाळून अनेक जण घाबरतात. येणाऱ्या समस्यांना स्विकारा आणि त्यामधून योग्य मार्ग काढा. यामुळे तुम्ही संकटांच्या दबावाखाली न येता त्याचा योग्य प्रकारे सामना करू शकता.
६) स्वत:ची योग्य ती काळजी घ्या. जेव्हा आपण तणावग्रस्त वातावरणात असतो, तेव्हा स्वत:बद्दल विचार करत नाही. त्या समस्येचा विचार करून उगाच चिंताग्रस्त होतो. यामुळे आपण स्वत:च्या शरीराला अस्वस्थ करून घेतो. परिणामी शरीराला पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. स्वत:च्या आरोग्यापेक्षा मोठी कुठलीच समस्या नसते.
७) जर तणावग्रस्त वाटत असेल, तर आपल्या मनाला आणि शरीराला आराम द्या. एक दीर्घ श्वास घेऊन शांत निपचित पडून राहा. यामुळे तुमचा थोडा तणाव कमी होईल. सातत्यानं काम केल्यानं तुमचा तणाव वाढू शकतो.
८) तणाव कमी करण्यासाठी आणि नकारात्मक विचार तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी ध्यान करणं हा उपाय उपयुक्त आहे. ध्यान केल्यानं तुमच्या मनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतात. मनावरील ताण कमी करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी रोज कमीत कमी २० मिनिटं योगा करावा.
९) गेल्या काही वर्षांमध्ये जीवनशैली वेगाने बदलली आहे. आहाराच्या, झोपेच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. बदलती जीवनशैली हे देखील वाढत्या आजारपणाचे एक कारण आहे.
१०) सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही समस्या निर्माण झाली की खचून जाऊ नका. त्याचा सामना करा. त्याची नेमकी कारणं काय? त्यावर उपाय काय? याचा विचार करा. यामुळे तुमच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतील. तुमचे विचार सकारात्मक झाले की तुम्हाला लढा देणं सोपं जातं.
११) समस्यांना कंटाळून मनात वाईट विचार येत आहेत? मग तुमचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवा. लहान मुलांसोबत खेळा, गेम्स खेळा, मोटिवेट करणारे चित्रपट पाहा. नक्कीच याची तुम्हाला समस्या विसरण्यास मदत होईल.
हेही वाचा