Independence Day 2020 : 'भारतीय रान माणूस'

१५ ऑगस्टला होणारं झेंडावंदन हे प्रत्येक भारतियासाठी अभिमानाचा क्षण... दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताचा तिरंगा डौलानं फडकणार. कोरोनाचं संकट असलं तरी हा अभिमानाचा हा सोहळा साजरा होणारच. कुठे ऑनलाईन तर कुठे कमी गर्दीद, पण तिरंगा तर फडकणारच. यामध्येच तर भारताचं वेगळेपण आहे. देशाची विविधतेतील एकता आणि निसर्गाची जैवविविधता याला सलाम करण्याचा प्रयत्न कोकणातल्या एका तरूणानं केला आहे.

तळकोकणात निसर्गपूरक पर्यटन करताना निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या माणसांना एकत्र घेऊन आलाय प्रसाद गावडे हा सावंतवाडीचा तरुण. त्यानं आतापर्यंत कोकणी रान माणूस नावाने ग्रामीण भागात अनेक पर्यावरणस्नेही उपक्रम राबवले आहेत.

जंगल, नदी, डोंगर ,समुद्र, खाडी तसंच दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारी देशाच्या दुर्गम भागातील माणसे जागतिक घडामोडींपासून अजूनही बर्‍यापैकी कोसोदूर आहेत. सो कॉल्ड विकासापासून दूर असली तरी आत्मनिर्भर आहेत. त्यांच्याही मनात भारत देशाबद्दल प्रचंड देशभक्ती, आस्था आणि प्रेम आहे. परंतु त्यांना कधी व्यक्त करण्याची संधी मिळाली नाही.

सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सागर कुडाळकर संकेत कुडाळकर,  मिलिंद आडेलकर, किशोर नाईक, महेश कोरगावकर यांच्या सहकार्यातून एक व्हिडिओ बनवण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये देशातील सगळ्यात स्वच्छ सुंदर आणि साक्षर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील कर्ली नदीच्या काठावरील नेरूर वालावल या गावात मालवणी संस्कृतीत वाढलेल्या अस्सल भारतीय रान माणसांचे हातातील काठीवर तिरंगा फडकवून सलाम करतानाचे चित्रण केले आहे.

बकरी पालन करणाऱ्या धनगर, गुरांना शेतीच्या केंद्रस्थानी मानणारा गुराखी, शेतकरी, नदीच्या प्रवाहात होडी चालवणारा तारी मामा यांच्या प्रत्येकाच्या हातातील बांबूच्या काठीवर तिरंगा फडकावला होता. आपण आपल्या निसर्ग पूरक जगण्यातून देशसेवाच करत आहोत अशा अविर्भावात त्यांनी त्या काठीवरील तिरंग्याकडे पाहिले आहे. सामान्य गावकऱ्यांचे जगणे हे सुद्धा देशाच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावत असते ज्याचा अभिमान त्यांच्या डोळ्यात दिसत आहे.


हेही वाचा

भारताचा अभिमान असलेल्या तिरंग्याबद्दल जाणून घ्या १० गोष्टी

पुढील बातमी
इतर बातम्या