भीमा-कोरेगाव येथे घडलेला हिंसाचार म्हणजे मोठं षडयंत्र होतं. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सतर्क रहावं, अशा सूचना देतानाच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांना दिला. दादर येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
येत्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भीमा-कोरेगाव सारखी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. भाजपाशासीत राज्यातील आणि केंद्रातील प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी करण्याबरोबरच, जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी केल्या.
केंद्र आणि राज्यातील सरकारकडून होणारी विकासकामे बघून सरकारला बदनाम करण्याचा काही मंडळींचा डाव सुरू असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी करतानाच विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला येत्या २६ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात 'तिरंगा रॅली' काढून उत्तर द्या, असं आवाहन केलं.
हेही वाचा-
संभाजी भिडेंच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका-प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट