बिहार विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता न आलेल्या काँग्रेसवर भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी तोंडसुख घेतलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत हातमिळवणी केल्याचाच फटका काँग्रेसला बिहार निवडणुकीत बसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये जेडीयू (४३) आणि भाजपच्या (७४) एनडीएला १२५ निसटतं बहुमत मिळालं असून आरजेडी (७५) आणि काँग्रेसच्या (१९) महाआघाडीने जोरदार टक्कर देत ११० जागा मिळवल्या आहेत. खासकरून या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीने ७५ जागा मिळवत भाजपला पिछाडीवर टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. परंतु जोडीदार काँग्रेसला (१९) या निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने त्यांची महाआघाडी अवघ्या काही जागांच्या फरकाने मागे राहिली.
हेही वाचा - “संजय राऊत महाराष्ट्रात शिवसेनेची अवस्था बिहारसारखी करतील”
सोबतच भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेलेल्या "जगंलराज का युवराज" ला बिहारच्या जनतेने नाकरलं.. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत "जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज" युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
तर, दुसऱ्या बाजूला राहुल गांधींना राजकारणात बरंच शिकावं लागेल. BJP समोर राजकरण करताना राजकारणाची उंची किती व कशी असली पाहिजे हे बिहार, MP, UP, कर्नाटका निवडणुकीने दाखवून दिलं. राहुल गांधींच्या नेहमीच्या १५ मिनिटांच्या भाषणामध्ये १२ मिनिटं फक्त मोदी साहेबांची बदनामी ही कोणाला पचत नाही आणि पटतही नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
bjp mla ashish shelar criticises congress and shiv sena after bihar assembly election result