महाराष्ट्रातील उद्योजक, बाॅलिवूड निर्मात्यांना धमकावण्यासाठीच योगींचा दौर-सचिन सावंत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त (योगी आदित्यनाथ) मुंबईत येऊन महाराष्ट्रातील उद्योजक आणि बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा हा कुटील डाव आहे. यासाठी उद्योजकांना धमकावण्याचा प्रयत्न देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

भाजपवर आरोप करताना सचिन सावंत म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त हे मुंबईत येऊन महाराष्ट्रातील उद्योजकांशी, बाॅलिवूड निर्मात्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यातून उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आमचा त्यांना सल्ला हाच आहे की उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. दिवसाढवळ्या हत्या होताहेत, बलात्कार-अत्याचार होताहेत, दलितांवर, गोरगरीबांवर अत्याचार होताहेत, सामाजिक बांधिलकी संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. सामाजिक एकतेचं वातावरण बिघडलेलं आहे.

त्यातच तुमची भाषा सामाजिक एकता नव्हे, तर विघटनवादी भूमिका घेणारी आहे. अशा परिस्थितीत आपल्या अधिपत्याखाली उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश न होता जंगलराज झालेलं आहे. त्यात आपलं योगदान आहे. हे देशातील आणि महाराष्ट्रातील लोकांना निश्चितपणे माहिती झालेलं आहे. त्यामुळेच तुमचे हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.

हेही वाचायोगी आदित्यनाथ मुंबईत येणार, उद्योगपती, सेलिब्रिटींना भेटणार

दुसरीकडे तुम्ही मोदी सरकारबरोबर जे षडयंत्र रचलं होतं, तेही लोकांसमोर आलं आहे. महाराष्ट्राची बदनामी करायची, इथल्या उद्योजकांमध्ये भीती निर्माण करायची, बाॅलिवूड निर्मात्यांमध्ये भीती निर्माण करायची, एनसीबीची ज्या पद्धतीने कारवाई झालेली आहे, सुशांतसिंह प्रकरणात भीती निर्माण करण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला. हे सगळं षडयंत्र होतं. त्यामागचा उद्देशच हा होता की इथला उद्योजक, बाॅलिवूड आपल्याकडे घेऊन जात महाराष्ट्राची अधोगती व्हावी, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

हे षडयंत्र उघड झाल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमची विनंती आहे की, ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांना हाताशी घेऊन उद्योजक, बाॅलिवूड सेलिब्रिटींना घाबरवण्याचा प्रयत्न झाला. तसाच घाबरवण्याचा, जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न यांच्यामार्फत देखील होऊ शकतो. त्याची काळजी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने घेतली पाहिजे, अशी मागणी देखील सचिन सावंत यांनी केली.

हेही वाचा- ‘फिल्म सिटी’ ऐवजी गुंडांपासून ’क्लिन सिटी’ वर भर द्या, गृहमंत्र्यांची योगींवर टीका

पुढील बातमी
इतर बातम्या