मेट्रो कारशेडसाठी (metro car shed) राज्य सरकारने निश्चित केलेल्या कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणली असून संबंधित जागेवर सुरू असलेलं काम थांबवण्याचे आदेश देखील न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा स्थगिती आदेश म्हणजे जनभावनेचा अनादर असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय निरूपम यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, आरेत मेट्रोचं कारशेड होऊ नये अशी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. या प्रकल्पासाठी कांजूरमार्ग इतका दुसरा उत्तम पर्याय कुठलाही नाही. उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडच्या कामावर बंदी आणून जनभावनेची अवहेलना केली आहे. योजना बनवणे आणि लागू करणे हे सरकारचं काम आहे, न्यायालयाचं नाही.
मुंबई मेट्रो-३ चं कारशेड आरेतून कांजूरमार्ग (kanjurmarg) येथील जागेवर हलवण्याचा मोठा निर्णय काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. परंतु न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता या निर्णयावर आणि मुख्यत्वेकरून मेट्रो कारशेडच्या कामावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
हेही वाचा- कारशेडच्या कामातून आम्ही ‘इतके’ पैसे वाचवतोय, आदित्य ठाकरेंनी स्थगितीनंतर दिली प्रतिक्रिया
कुठलीही विकासकामे ही आपण लोकांच्या हितासाठी करतो. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हार जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी ठाकरे सरकारने हट्ट सोडून पुढाकार घेतला पाहिजे. कारण मेट्रोच्या कामासाठी लाणारा पैसा हा जनतेचा म्हणजे सर्वांचाच आहे. सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम होत आहे. तेव्हा ही आडमुठी भूमिका सोडून आरेमध्ये तात्काळ कारशेड उभारण्याचं काम सुरू व्हावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(congress leader sanjay nirupam criticizes bombay high court judgement of imposing stay on mumbai metro car shed in kanjurmarg)