महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पर्दाफाश केल्यानेच त्यांना सूडबुद्धीने अंमलबजावणी संचलनालया (ED)कडून नोटीस पाठवण्यात आल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठविली असून येत्या २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच, उद्योजक उन्मेष जोशी यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी मोदी, शहा जोडगोळीवर घणाघाती शब्दांत टीका केली होती. त्याचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी विरोधी पक्षांना एकत्रित करत ईव्हीएमविरोधात जनआंदोलन छेडलं आहे. ३०० हून अधिक मतदानक्षेत्रांत गडबड झाल्यानेच भाजपा बहुमताने पुन्हा सत्तेवर आलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरनेच घेण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या चौकशा लावल्या जात आहेत. ज्येष्ठ काँग्रसे नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना अशाच प्रकारे त्रास देण्यात येत आहे. मोदी, शाह ही जोडी लोकशाहीला हरताळ फासून हुकूमशाही पद्धतीने देश चालवत असल्याने हे लोकशाहीसाठी घातक आहे. राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस अशीच सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे.
हेही वाचा-
अशा नोटिशींना मनसे भीक घालत नाही- संदीप देशपांडे
बिझनेसमध्ये उतरलं की अशा गोष्टींना तोंड द्यावंच लागतं- मनोहर जोशी