फोन टॅप करणे ही काँग्रेसची संस्कृती- देवेंद्र फडणवीस

पिगॅसीस स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. फोन टॅपिंगच्या मु्द्दयावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगप्रकरणी काँग्रेस (congress) आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले.

यासंदर्भात आरोप करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोन टॅप करणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. यापूर्वीची अनेक उदाहरणे आहेत. अलिकडेच राजस्थानमध्ये काँग्रेसच्याच आमदारांनी त्यांच्याच सरकारवर असे आरोप केले होते. 

हेही वाचा- पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा, निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीका

यूपीए सरकारच्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीररित्या योग्य आहे हे सांगण्यात आलं. समजावादी पक्षाचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. त्याला लोकसभेत उत्तर देताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रिग रोखण्यासाठी झाल्याचं सांगत त्याचं समर्थन केलं होतं, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले.

हा पिगॅसीसचा विषय ४५ देशांशी संबधित असला, तरी चर्चा केवळ भारताची होत आहे. खरं तर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. पिगॅसीससंदर्भात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. माध्यमांमध्ये अनेक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. पण विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. संसद अधिवेशनाचा खोळंबा व्हावा, असा प्रयत्न विरोधक करीत आहेत. आज केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मागास प्रवर्गाचे मंत्री आलेत. ते विरोधकांना पाहवत नाही, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

हेही वाचा- गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या