सावरकर पंतप्रधान असते, तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता- उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर पाकिस्तान अस्तित्वातच नसता आला, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारक इथं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘सावरकर-इकोज फ्राॅम अ फरगाॅटन पास्ट’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

सच्चे देशभक्त

सावरकर एक सच्चे देशभक्त आणि प्रखर राष्ट्रवादी होते. क्रांतीकारक आणि दहशतवादी यामध्ये मोठा फरक आहे. सावरकर यांची क्रांती रक्तरंजित नव्हती, तर ती विधायक हिंसेची होती. त्यांच्या हातून क्रांती घडली नसती, तर वेगळा इतिहास निर्माण झाला असता. खरं तर सावरकर आपल्याला समजलेच नाहीत आणि हिच खरी शोकांतिका आहे. 

तर, पाकिस्तानच नसता

देशाचे तत्कालिन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी काश्मीरप्रश्न हाताळला असता, तर आज काश्मीरचा प्रश्न सुटला असता, असं म्हटलं जातं. पण वीर सावरकर असते, तरी पाकिस्तानच जन्माला आला नसता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

काँग्रेसवर निशाणा

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यसैनिक होते. ते तुरूंगात गेले होते. असं काँग्रेसचं नेहमी म्हणणं असतं. ते मी अमान्य करत नाही. स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल मी गांधी- नेहरू घराण्याचा आदर देखील करतो. परंतु वीर सावरकर यांनी १४ वर्षे तुरूंगात ज्या यातना भोगल्या, तशा यातना नेहरूंनी १४ मिनिटे जरी सहन केल्या असत्या, तरी मी त्यांना नक्कीच ‘वीर नेहरू’ म्हणून संबोधलं असतं.  

जोड्याने हाणलं पाहिजे

पारतंत्र्याच्या काळोखात लखलखून गेलेली वीज म्हणजे वीर सावरकर होते. त्यांना खरं तर भारतरत्न मिळायला हवा होता. काँग्रेसने त्यांचा कितीही द्वेष केला, तरी सावरकरांचे विचार संपणार नाहीत. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोड्याने हाणायला पाहिजे. मी पैज लावतो की मणीशंकर अय्यर जेव्हा केव्हा मुंबईत येतील, तेव्हा त्यांना शिवसैनिकांचा सामना करावा लागेल, असंही उद्धव म्हणाले. 


हेही वाचा-

राज्यसभेतही असावं जातीनिहाय आरक्षण- रामदास आठवले

हेच पळपुटे, कुठून तरी तुमच्या तंबूत शिरले होते, शिवसेनेची पवार यांच्यावर टीका


पुढील बातमी
इतर बातम्या