शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या...

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी आपल्या अधिकारांतर्गत तसा आदेश काढला आहे. यामुळे मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. (local authority can take a decision about school reopening says maharashtra education minister varsha gaikwad)

येत्या २३ नोव्हेंबरपासून राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे निर्देश याआधीच राज्य सरकारने दिले आहेत. यावर बोलताना शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापी, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. 

हेही वाचा- मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

हेही वाचा- विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय- वर्षा गायकवाड
पुढील बातमी
इतर बातम्या