मोदी सरकार महाविकास आघाडी अस्थिर करण्याच्या प्रयत्नात, काँग्रेसचा आरोप

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी हे आरोप केले आहेत.

आमदार प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या पत्रातून त्यांचा मानसिक छळ होत आहे हे लक्षात येतं. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. येनकेन प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप अत्यंत खालच्या पातळीवर उतरली आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सोबतच सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राचा काही मजकूर देखील टाकला आहे.

याआधी ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचं काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हेही वाचा- “राष्ट्रवादी-शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा”

महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजपा मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचं, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत.

परंतु या दबावतंत्रामुळे भाजपचं सत्तेचं दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असं ठाम मत नाना पटोले यांनी मांडलं आहे.

ईडीच्या प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे. 

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. १० जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे.

(maharashtra congress leader sachin sawant allegations on modi govt after pratap sarnaik letter)

हेही वाचा- संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं- प्रताप सरनाईक
पुढील बातमी
इतर बातम्या