Advertisement

“राष्ट्रवादी-शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा”

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अप्रत्यक्षपणे टोमणे मारले जात असताना काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे

“राष्ट्रवादी-शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा”
SHARES

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अप्रत्यक्षपणे टोमणे मारले जात असताना काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपविरोधात आघाडी उभी करायची असेल, तर ती काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

२०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भारतीय जनता पक्षाविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातून वारंवार उघड झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्याने विरोधकांवर दबाव आणण्याचं काम ते करत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना दिल्या जात असलेल्या त्रासाला पत्रातून वाचा फोडली आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा- शिवसेनेने जर मैत्रीचा हात पुढं केला तर…, चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर

महाराष्ट्रातील सत्तेपासून वंचित राहिल्याने भाजपा मागील दीड वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचं, विरोधांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरु आहेत.

परंतु या दबावतंत्रामुळे भाजपचं सत्तेचं दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही, असं ठाम मत नाना पटोले यांनी मांडलं आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा शिवाय शेतकरी कुटुंबातीलच हवाय, असं मतही नाना पटोले यांनी व्यक्त केलं होतं.

त्यावर कोरोनाच्या संकटाच्या काळात स्वबळाची भाषा केल्यावर लोकं जोड्याने हाणतील, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्याचं नाव न घेताच शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमात लगावला होता.

(maharashtra congress president nana patole gives best wishes to shiv sena and ncp future alliance)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा