
महाराष्ट्र सरकारने 24 फेब्रुवारी रोजी मेट्रो-८ मार्गाला मंजुरी दिली आहे. हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे. दोन्ही विमानतळांदरम्यानची जोडणी सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात आंतरराज्य बसस्थानकाजवळ कारशेड उभारण्याचाही समावेश आहे.
या योजनेनुसार, मंडळे येथील 27.2 हेक्टर राखीव मँग्रोव्ह (खारफुटी) जमीन कारशेडसाठी वापरली जाणार आहे. नगरविकास विभागाने ही जमीन हस्तांतरित करण्यासंबंधी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. ही जमीन मेट्रो-2 बीच्या मंडळे कार डेपो शेजारी असल्याचे सांगितले जाते.
या निर्णयावर पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. पायाभूत सुविधांसाठी मँग्रोव्ह जमीन वापरण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. याआधीही भाईंदर येथील प्रस्तावित कारशेड आणि आरे जंगलातील मेट्रो-3 कारशेडच्या वेळी अशाच प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, विमानतळाजवळील जमीन व्यावसायिक वापरासाठी राखीव असल्याने मंडळे येथे कारशेड उभारणे सोपे ठरले. मंत्रिमंडळाने संपूर्ण प्रक्रियेला मंजुरी दिली असून, काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या जाणार आहेत.
2021च्या सर्वसमावेशक परिवहन अभ्यास अहवालात (Comprehensive Transport Study) ठाणे खाडीमार्गे मेट्रो जोडणीची गरज अधोरेखित करण्यात आली होती. नवी मुंबईतील झपाट्याने वाढ आणि दोन्ही शहरांदरम्यान वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भविष्यात अपुरी ठरू शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला होता.
दरम्यान, पर्यावरण कार्यकर्त्यांनी जमीन हस्तांतरणावर तीव्र टीका केली आहे. कारशेड झोपडपट्टीच्या जमिनीवर का हलवू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारची जमीन झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासाठी वापरता येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
