सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत असलेली शिवसेना दुबळी होण्याचं काम होतंय. अजूनही वेळ गेलेली नसून भाजपशी जुळवून घेता आलं तर बरं होईल, असं काही शिवसेना (shiv sena) आमदारांना आतल्या आत वाटत आहे. शिवसेनेने जर मैत्रीचा हात पुढं केला, तर भाजप खरोखरच सर्वकाही विसरून पुन्हा सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करेल का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हाच प्रश्न प्रसारमाध्यमांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना विचारला, यावर ते म्हणाले, शिवसेनेच्या अनेक आमदारांना आणि खासदारांना असं वाटत असलं, तरी जे वाटतं ते व्यवहारात आणण्याची त्यांची क्षमता नव्हे, तर डिसिप्लिन नसेल. तसंच भाजपमध्ये माझ्यासहीत माधवराव भंडारी यांच्यासहीत आम्हाला काय वाटतं, हे वाटणं जरी खरं असलं, तरी ते प्रत्यक्षात आणण्याचं काम आमचं नाही. तर हे अधिकार अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगतप्रसाद नड्डा यांच्याकडे आहेत.
हेही वाचा- संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं- प्रताप सरनाईक
भारतीय जनता पार्टी अध्यक्ष-ओरिएंटेड पार्टी असल्यामुळे जर शिवसेनेने मैत्रीचा हात पुढे केला तरीही तो स्वीकारायचा की नाही हे ठरवण्याचे अधिकार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा जी यांच्याकडे आहेत. pic.twitter.com/3axhBCFkKo
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 21, 2021
त्यांच्याकडे एक बरं आहे एकहाती आहे, ते म्हणजे उद्धवजी जे ठरवतील ते फायनल. पण आमच्याकडं टीम आहे. त्यामुळे जरी आम्हाला वाटलं, शिवसेनेचा मैत्रीचा हात पुढं आला आहे, तरी त्या हातामध्ये हात मिळवायचा की नाही, हे खासगीत जरी वाटलं, तरी पक्ष म्हणून आमची पार्टी ही अध्यक्ष-ओरिएंटेड असल्यामुळे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे जगतप्रसाद नड्डा यांच्या हातात आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ईडीच्या प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी (bjp) जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी २ पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. १० जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे.
(bjp maharashtra president chandrakant patil comment on alliance with shiv sena)