राष्ट्रवादीचे ३ बेपत्ता आमदार मुंबईत परतले, सांगितला सुटकेचा थरार

राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारपासून 'बेपत्ता' असलेले ४ पैकी ३ आमदार अखेर सोमवारी मुंबईत परतले. या आमदारांमध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ आणि अनिल पाटील, अशी या आमदारांची नावे आहेत. या आमदारांना गुरूग्रामधील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. मुंबईत परतल्यावर या आमदारांनी आपल्या सुटकेचा थरार प्रसारमाध्यमांना सांगितला.

या नाट्यामागची हकीकत सांगताना नरहरी झिरवळ म्हणाले, 'अजित पवार यांनी आम्हाला रात्री फोन करून सकाळी थेट राजभवनात यायला सांगितलं होतं. पक्षाचे गटनेता असल्यानं आम्ही कर्तव्य समजून त्यांच्या सांगण्यानुसार सकाळी तिथं गेलो. तिथं अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला. तेव्हा आम्हाला सर्वकाही संशयास्पद असल्याचं वाटलं. त्यानंतर आम्हाला थेट दिल्लीला नेण्यात आलं. उरलेले आमदारही संध्याकाळपर्यंत येतील असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. 

तर, आम्हाला ज्या हाॅटेलमध्ये ठेवलं होतं तिथं भाजपचे शंभर-दीडशे कार्यकर्ते आणि पोलिस होते. अखेर आम्ही कसंतरी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला धीर देऊन स्थानिक कार्यकर्ते तुमची मदत करतील असं आश्वासन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते धीरज शर्मा आणि सोनिया दुहण कार्यकर्त्यांसोबत हॉटेलमध्ये पोहोचले. काही मिनिटांतच त्यांनी आम्हाला बाहेर काढून दिल्लीत आणलं. त्यानंतर दिल्लीतून आम्ही मुंबईत आलो. आमचे नेते फक्त शरद पवारच आहेत. आमची आमदारकी राहो अथवा न राहो आम्हाला त्याची पर्वा नाही. पक्षनिष्ठा आमच्यासाठी महत्वाची आहे, ' असं दौलत दरोडा यांनी सांगितलं.

सध्या पिंपरी चिंचवड येथील आमदार अण्णा बनसोडे या एकमेव आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा आहे, त्यांचंही मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलं. राष्ट्रवादाचे एकूण ५४ आमदार निवडून आले होते. त्यापैकी अजित पवार आणि बनसोडे वगळून आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या ५२ झाली आहे. 


हेही वाचा-

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

महाविकास आघाडीचाही सत्तास्थानेसाठी दावा, दिलं १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र


पुढील बातमी
इतर बातम्या